बनकर वस्तीचा रस्ता २५ वर्षापासून प्रलंबित:
देवदैठण ग्रामस्थांची रस्ता देण्याची तहसीलदारांकडे पुन्हा मागणी
जामखेड प्रतिनिधी
सरकारच्या मातोश्री पानंद रस्ता योजनेला देवदैठण मध्ये अडचण येत आहे.
राज्यातील कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी महायुती सरकार आता शेतकऱ्यांना मोफत पाणंद रस्ते बांधून देणार आहे. विशेष म्हणजे पाणंद आणि शिव रस्त्यांची मोजणी सरकारी पैशातून होणार असून शेतकऱ्यांमध्ये भांडणे होऊ नये, यासाठी पोलिस संरक्षणाचा खर्चसुद्धा सरकार करणार आहे.
असे असतानाही जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील बनकर वस्तीवर जाण्या येण्यासाठी प्रशासनाकडे गेल्या पंचवीस वर्षापासून येथील रहिवासी मागणी करत आहेत. अद्यापही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना , शेतीमाल वाहतुकीसाठी शेतकरयांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

.बनकर वस्तीवर सुमारे शंभर च्या आसपास लोक राहतात पण वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही. याबाबत २०२३ मध्ये तत्कालीन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी रस्ता मोकळा करण्याचा आदेश काढला होता संबंधित अतिक्रमण धारक शेतकरी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे गेले होते. तहसीलदार यांच्या आदेशाला स्थगिती दिली यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली. 
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी, आजारी रुग्ण, शेती माल व गावातील नागरिकांना रस्ता नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या चिखल तुडवत जावे लागत आहे. येण्या जाण्यासाठी मोठ्या लोकांना अडथळा निर्माण केला जात आहे.
बनकर वस्तीवर जाण्यासाठी पानंद रस्ता मंजूरी होऊन सुमारे ८० टक्के काम झाले आहे. फक्त २० टक्के काम बाकी आहे. यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. संबंधित २० टक्के राहिलेल्या रस्त्यासाठी काही शेतकऱ्यांचा सर्व्हे नंबर बांधावरील रस्त्यासाठी अडथळा निर्माण केला आहे.महसूल मंत्री यांच्या पानंद रस्ते खुले करण्याच्या नवीन आदेशानुसार आता परत बनकर वस्तीवर जनतेने रस्त्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्या कडे मागणी केली आहे.
आता तहसीलदार या प्रलंबित रस्त्याचा व त्यावरील अतिक्रमणाचा कसा निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
